Friday, February 11, 2011

समर्थ रामदास स्वामी व जगद्गुरु संत तुकाराम - नरदेह स्तवन


नरदेह स्तवन

महाराष्ट्र संतांची भूमी, महंतांची भूमी. या महाराष्ट्रात संतांची मांदियाळीच होती अन् आहे. ही परंपरा सुरु होते ती कैवल्यसम्राट ज्ञानेश्वर महाराजांपासून. यात अठरा पगड जातीचे संत होते. ब्राह्मण, मराठा, नाभिक, सुतार, सोनार, महार, चांभार, कसाई, वाणी. यां संतांनी महाराष्ट्रात भक्तीचे मळे फुलवले.
भक्तीच्या माध्यमातून नराचा नारायण केला. या भुमीत भक्ती अन् शक्ती युक्तीने एकत्रित नांदली. याच भुमीत संतांचे राजे ज्ञानेश्वर महाराज, तर राजांमधील संत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. देवांनाही हेवा वाटवा अशी ही भूमी.

इ. स. १६०८ मध्ये या महाराष्ट्रात नवल घडले. कालपुरुषही कालगणना करीत असताना थांबला असेल. या वर्षी दोन अवतारी पुरुषांचे अवतरण झाले. हे दोन महापुरुष म्हणजे राष्ट्र्गुरु समर्थ रामदास स्वामी जगद्गुरु संत तुकाराम महाराज. समर्थांचा जन्म जांबेचा, साधनेचे स्थान टाकळी नासिक, तर कार्यक्षेत्र कृष्णाखोरे. तुकाराम महाराजांचे जन्मस्थान, साधनास्थळ व कार्यक्षेत्र देहू. दोघांचे उपास्यदैवत भिन्न. समर्थांचे उपास्यदैवत प्रभू रामचंद्र, तर तुकोबारायांचे पांडुरंग. दोघांचे संप्रदाय पण भिन्न. समर्थांचा रामदासी संप्रदाय तर तुकोबांचा वारकरी संप्रदाय. वरपांगी हि भिन्नता असली, तरी अंतरंगातून ते एकाच होते. दोघांनी जळी-स्थळी-काष्टी पाषाणी नटलेल्या चैतन्याची अनुभूती घेतल्याने दोघांनी एकच विचार मांडले. समर्थ रामदास म्हणतात, " साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरुपी मिळाले " दोघांच्या विचारांतील ऐक्य मांडण्याचा हा अल्पसा यत्न.

या पृथ्वीवर अनेक सजीव आहेत. परमेश्वराने माणसाला आगळावेगळा देह देऊन विचार करण्याचे व तो किंवा दानव होऊ शकतो. त्यालाच ठरवायचे आहे की, आपण GOD व्हावयाचे की DOG व्हावयाचे. देवत्वाच्या दिशेने प्रवास करण्याचे साधन म्हणजे हा नरदेह म्हणूनच हे संतद्वय नरदेहाचे स्तवन करतात.

श्री समर्थ रामदास
धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो ॥
जो जे की परमार्थ हो । तो तो पावे सिद्धीते ॥

देह परमार्थी लाविले । तरीच याचे सार्थक जाले ।
नाही तरी हे वेर्थचि गेले । नाना आघातें मृत्यूपंथे ॥

बहुत जन्माचा सेवट । नरदेह सापडे अवचट ॥
येथे वर्तावें चोखट । निती न्यायें ॥       

या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनाचेनि द्वारें ।
मुख्य सारासार विचारें । बहुत सुटलें ॥

या नरदेहाचेनि संमधे । बहुत पावले उत्तम पदे ।
अहंता साडुनि स्वानंदे । सुखी जाले ॥

जगद्गुरु श्री तुकाराम
मोलाचें आयुष्य वेचोनियां जाय । पूर्वपुण्ये होय लाभ याचा ॥
अनंत जन्मीचा शेवट पाहतां । नरदेह हातां आला तुझ्या ॥
करील तें जोडी येईल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागी ॥
सांचलिया धन होईल ठेवणें । तैसीं नारायण जोडी करा ॥
करा हरीभक्ती परलोकीं कामा । सोडवील यमा पासोनियां ॥
तुका म्हणे करा आयुष्याचें मोल। नका वेचूं बोल नामाविण ॥

सार्थ तुकारामाची गाथा अभंग क्र.. ३०२४

शरीर उत्तम चांगले । शरीर सुखाचे घोसुलें ॥
शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥
शरीर सकाळी शुध्द । शरीर निधीचाही निध ॥
शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यभागीं देव शरीर ॥
शरीरा दु:ख नेदावा भोग । न द्यावे सुख न करीं त्याग ॥
शरीर वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरिभजनी ॥

सार्थ तुकारामाची गाथा अभंग क्र.. ४११३


॥ जय जय रघुवीर समर्थ ॥