Wednesday, March 23, 2011

आकाश आणि समुद्र यांची भेट ...



अली आदिलशहाने शहाजीराजांना नुसती अटकच केली नाही तर शिवाजीमहाराजांना पत्र पाठवून विचारणा केली -
काय हवंय तुम्हाला ? आईचे सौभाग्य, की स्वराज्य ? शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेला तीन चार वर्षांपूर्वीच प्रारंभ केला होता आणि स्वराज्यावर हे विघ्न आले. तेव्हा शिवाजी महाराजांना वाटले की, आपल्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असावे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे हे तो खरेच खरेच, पण त्यास साधुसंतांचे आशीर्वाद लाभावेत. महाराज पुण्यात होते. जवळच देहू गावी संत तुकाराम यांचे वास्तव्य होते. त्यांची अमृतवाहिनी अभंगवाणी शिवरायांनी ऐकली होती –

बुडते हे जन देखवेना डोळा ।
म्हणोनि कळवळा येतो आम्हां ॥
तख्तावरती बैसोनिया अन्नाविण पिडीती लोकां
तुका म्हणे आता धावा काय निद्रा केली देवा ॥

तुकोबांचा हा धावा व त्यात दडपलेली जनकल्याणाची आस शिवराय जाणून होते. राजे देहूला गेले आणि त्यांनी तुकाराममहाराजांना अनुग्रह देण्याची विनंती केली. तुकाराममहाराजांचा अंतकाळ समीप आला होता. त्यामुळे त्यांनी महाराजांना सांगितले,

राया छत्रपती । ऎकावे वचन । रामदासी मन । लावी वेगी ॥ १ ॥
रामदास स्वामी । सोयरा सज्जन । त्यासी तनमन । अर्पी बापा ॥ २ ॥
मारुति अवतार । स्वामी प्रगटला । उपदेश केला । तुजलागी ॥ ३ ॥

आणि शिवरायांना चाफळला जाण्यास सांगितले. पंढरपूर येथे समर्थ आणि तुकोबा यांची भेट झाली होती. दोघांचे परस्परावर अतिशय प्रेम होते. म्हणूनच मनाचा मोठेपणा दाखवून तुकाराम महाराजांनी शिवरायांना रामदासांचे नाव सुचवले. दुर्दैवाने या भेटीनंतर दीडच वर्षात म्हणजे १६५० सालच्या फेब्रुवारी महिन्यात तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. शिवाजी महाराजांनी तुकोबांचे दर्शन घेतले आणि ते वाई परगण्यात आले. शिवाजी महाराजांच्या भेटीची ओढ समर्थांनादेखील लागली होती. त्यांचे शिष्य भिक्षेच्या निमित्ताने संचार करीत असताना शिवछत्रपतींच्या सर्व हालचाली समर्थांच्या कानावर येत असत. छत्रपतींची छावणी वाईला असताना, समर्थांनी दिवाकर गोसावी आणि उध्दव गोसावी ह्यांना शिवरायांकडे पाठविले. दोघेजण वाईला पोहोचले. त्यांनी समर्थांचे पत्र शिवाजी राजांना दिले. छत्रपती वाचू लागले –

लिखित
॥ श्री गणेशाय नमः ॥
निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥१॥

परोपकाराचिया रासी । उदंड घडती जयासी ।
तया गुण महत्वासी । तुळणा कैंची ॥२॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥३॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥४॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥५॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥६॥

तीर्थें क्षेत्रें तें मोडलीं । ब्राह्मणें स्थानभ्रष्ट जालीं ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥७॥

देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥८॥

शूर पंडित पुराणिक । कवेश्वर वैदिक याज्ञिक ।
धूर्त तार्किक सभानायेक । तुमचा ठाई ॥९॥

या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥१०॥

आणीक हि धर्मकृत्यें चालती । आश्रित होऊनी कितेक असती ।
धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥११॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥१२॥

तुमचे देसीं वास्तव्य केलें परंतु वर्तमान नाहीं घेतलें ॥१३॥
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काये तयांप्रती ।

धर्म स्थापनेची कीर्ति । सांभाळिली पाहिजे ॥१४॥
राजकारण उदंड दाटले । तेणें चीत विभागलें ।

प्रसंग नस्तां लिहिलें । क्षमा केलें पाहिजे ॥१५॥
इति लिखित नाम समास ॥१॥

महाराजांनी पत्र वाचले. मस्तकी धारण केले आणि दिवाकरास म्हणाले, - चला तत्काळ निघायचे. पंत, या दोघांची फराळाची व्यवस्था करा आणि आमचेबरोबर तीनशे स्वारांची व्यवस्था करा.

दिवाकर आणि उध्दव ह्यांनी फराळ केला. तीनशे घोडेस्वार चाफळच्या दिशेने धावू लागले. चाफळच्या कारभारी श्रीमंत अक्कास्वामी ह्यांनी सर्वांचे स्वागत केले. समर्थ शिंगणवाडीच्या बागेत आहेत असे समजले तेव्हा शिवाजी महाराज तत्काळ शिंगणवाडीला जायचे म्हणत होते. तेव्हा अक्काबाई नम्रपणे म्हणाल्या – रामरायाचे दर्शन घ्या राजे, मग रामरायाचा प्रसाद घ्या. प्रसाद घेतल्याविण तुम्हांस बागेत पाठविले तो स्वामी मजला रागेजोन भरतील. तो दिवस होता वैशाख शुध्द नवमी. गुरुवार दिनांक १२ एप्रिल १६४९. प्रभू रामचंद्राचे दर्शन आणि प्रसाद घेऊन महाराज शिंगणवाडीच्या दिशेने निघाले. बरोबर दिवाकर आणि उध्दव होतेच. समर्थ आंब्याच्या झाडाखाली बसले होते व त्यांच्या सूचनेनुसार कल्याणस्वामी ग्रंथलेखन करीत होते. शिवाजीराजे बागेत पोहोचले. समर्थ आपल्या आसनावरून उठले आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी राजांचे स्वागत केले. शिवाजी महाराज समर्थांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकणार तेवढ्यात त्यांचे दोन्ही दंड धरुन समर्थांनी त्यांना प्रेमाने मिठी मारली आणि ते म्हणाले -

तुम्ही आम्हाला नमस्कार नाही करायचा. तुम्ही आमचे बंधूच. आपण दोघे तुळजाभवानीचे पुत्र. तुम्ही ईश्वराचे अवतार. धर्मसंस्थापनेसाठीच रामाने तुम्हांस धाडीले.

तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, - स्वामी, तुम्ही आमच्यापेक्षा बावीस वर्षांनी वडील आहांत. तेव्हा धाकट्या भावाने थोरल्या भावास वाकून नमस्कार करु नये हा कोण्या मुलुखाचा कायदा ?

राजांनी समर्थांना वाकून नमस्कार केला. समर्थांनी त्यांना पुन्हा हृदयाशी धरले. साक्षीला होता शिंगणवाडीचा मारुती. शिवाजी आणि समर्थ रामदास ह्यांची भेट म्हणजे हवा आणि सूर्यप्रकाश ह्यांचे मीलन. शिवसमर्थ भेट म्हणजे गंगा आणि यमुना ह्यांचा संगम. दोघांची शरिरे भिन्न होती पण आत्मा मात्र एकच होता. समर्थ संन्यासी होते. पण योध्दा-संन्यासी होते. शिवाजीराजे योध्दा होते पण संन्यस्त योध्दा होते. हे दोघे एकत्रित आले आणि त्यायोगे धर्मकारण आणि राजकारण ह्यांचा सुमुधुर समन्वय महाराष्ट्राच्या इतिहासात घडला. विक्रम आणि वैराग्य एकमेकांस कडकडून भेटले. जणू याज्ञवल्क्य आणि जनक ह्यांची भेटच ! नव्हे, कृष्ण आणि अर्जून ह्यांचीच भेट ! अं हं ! ही भेट श्रीराम आणि वसिष्ठ ह्यांचीच. ही भेट,

भगवद्गीता अस म्हणते,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ 
परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

आणि याच भगवदगीतेच्या श्लोकाचा जणू भावार्थ करताना श्रीसमर्थ म्हणतात,

धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
 जाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥

या गीतेतील श्लोकाचा सगुण अवतार होय. उभा महाराष्ट्र स्तिमित होऊन ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज ह्यांचे हे मीलन पाहात होता. विवेकसत्ता आणि राजसत्ता जणू हातांत हात घालून चालत होत्या आणि आपल्या पाउलखुणा भावी इतिहासासाठी ठेवत होत्या. ह्या पाउलखुणा म्हणजे -

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥

छत्रपती शिवाजी महाराज ही सामर्थ्याची प्रचंड चळवळ होती आणि समर्थ रामदास हे त्या चळवळीला लाभलेले भगवंताचे अधिष्ठान होते.

इति ...सरते शेवटी आजची वाद-विवाद, अकलेचे तारे तोडणार्‍याच्यां स्पर्धेवर समर्थांचेच हे उत्तर ...

सत्य कळावयाकारणें | बोलिलीं नाना निरूपणें
तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ ”

श्रीराम

Monday, March 21, 2011

पहा, अंत:करणाचा एक टवका ऊडतो का ?


श्रीराम !!!

भारतभ्रमणात पाहिलेले अनन्वित अत्याचार त्यांनी मातेस व श्रेष्ठ गंगाधरस्वामींना निवेदन केले.
समर्थ आईस म्हणाले -

“ आई, तुझ्यापेक्षा एक मोठी आई मला हाक मारते आहे. श्रेष्ठांसारखे अनेक देशबांधव माझी प्रतीक्षा करत आहेत. मला आता या छोट्या मायापाशात बध्द करु नकोस. राष्ट्राच्या उत्थानार्थ मला प्रेमाचा निरोप दे. अशा हजारो युवकांचे बलिदान या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात हवे आहे. ”

राणूबाई एकदम उठून आत गेल्या.; त्या कशासाठी गेल्या त्या ते समर्थांना कळेना. हातात पळी, फुलपात्रे घेऊन त्या आल्या व पोरावर पाणी सोडून म्हणाल्या -

“ नारायणा, हे तुझ्यावर पाणी सोडले. खुशाल राष्ट्रासाठी आपले जीवन अर्पण कर. फक्त एकच अट आहे, माझ्या अंतकाळी मात्र जरुर ये. तुझ्या हातचे पाणी घेऊनच मी जगाचा निरोप घेईन. ”

समर्थांनी आईला वचन दिले. वैशाख संपला व समर्थांनी मातेचे व श्रेष्ठांचे प्रेमळ आशिर्वाद घेतेले. सारे जांब गाव समर्थांना निरोप देण्यासाठी गावाबाहेर वेशीजवळ जमले होते. ग्रामस्थांनी हार घालून त्यांचा सत्कार केला. राणूबाईंचे डोळे सुखावले. देशस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन एका मातेने आपला एक पुत्र राष्ट्राच्या झोळीत टाकला. सामान्य माणसाचे अश्रू पुसण्यासाठी मातेने एक प्रचारक धाडला.

सज्जन हो,
हे सर्व जाणुन घ्या. आजही या राष्ट्राच्या झोळीत अनेक प्रचारकांची गरज आहे. जे समर्थ कार्य आहे ते अजून अर्धवटच आहे. आज पुन्हा या राष्ट्रमातेला अशा अनेक आईंच्या युवकांची गरज आहे. हे गांभिर्य सर्व सद्य पिढीने लक्षात घ्या. नाहीतर पुढे आपण कोणताच आदर्श समाजाला दाखवू शकणार नाही.

सर्व मातांना पण श्रीसमर्थ हे सांगत आले आहेत आणि आजही सांगत आहेत,
“ देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवा कि बुडवावा । धर्म संस्थापनेसाठी ॥ ”


जय जय रघुवीर समर्थ !!!

नाम त्याचे रामराय । रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥


आपल्या मातेसाठी समर्थांनी एका अभंगाची रचना केली. पहा ...

होते वैंकुंठीचे कोनी । शिरले अयोध्याभुवनी ।
लागे कौसल्येचे स्तनी । तेचि भूत गे माये ॥

जाता कौशिक राऊळी । अवलोकिली तये काळी ।
ताटिका ते छळूनि मेली । तेचि भूत गे माये ॥

मार्गी जाता वनांतरी । पाय पडला दगडावरी ।
पाषाणाची जाली नारी । तेचि भूत गे माये ॥

जनकाचे अगंणी गेले । शिवाचे धनु भंगिले ।
वैदेही अंगे संचारले । तेचि भूत गे माये ॥

जेणे सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तत्काळचि भ्याला ।
धनु देऊनि देह रक्षिला । तेचि भूत गे माये ॥

पितयाचे भाकेशी । कैकयीचे वचनासी ।
मानुनी गेले अरण्यासी । तेचि भूत गे माये ॥

चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी ।
सांगाते भुजंग पोसी । तेचि भूत गे माये ॥

सुग्रीवाचे पालन । वालीचे निर्दालन ।
तारी पाण्यावरी पाषाण । तेचि भूत गे माये ॥

रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण ।
तोडी अमरांचे बंधन । तेचि भूत गे माये ॥

सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय ।
रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥


॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

एक कटाक्ष या गोष्टीकडे ....भाग - २


!! श्रीराम समर्थ !!

अयोध्या, मथुरा, वृंदावन, कशी इ. ठिकाणी मठस्थापना करीत असता, काशी येथील मठात समर्थांना पहाटे स्वप्न पडले. स्वप्नात त्यांनी पाहिले की, महाराष्ट्रात मराठ्यांचा राजा सिंहासनावरती बसला असून वेदमंत्र - घोषासह त्याला राज्याभिषेक होतो आहे. ते जागे झाले, ते शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने. त्यांना एकदम शहाजी महाराजांच्या भेटीची आठवण झाली. महाराष्ट्र हे आपले कार्यक्षेत्र आहे हे त्याच वेळी समर्थांनी निश्चित केले. आसामला, सिमल्याजवळ आणि राजस्थानात जयपूरला त्यांनी मठस्थापना केली. आचार्य गोपालदास यांना जयपूर मठाचे मठपती नेमून आपल्या चरण-पादुका प्रसाद म्हणून दिल्या. आजदेखील जयपूरमधील हा मठ क्रियाशील असून आचार्य धर्मेंद्र हे विद्यमान मठपती कट्टर हिंदुत्ववादी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासमवेत तुरुंगात असलेले देशभक्त रामचंद्रवीर हे आचार्य धर्मेंद्र यांचे वडिल, मोठे क्रांतिकारक होते. अशा प्रकारे राष्ट्रवादाचे बीजारोपण समर्थांनी आपल्या भ्रमणातच केले होते. 

त्यांचे अंत:करण मात्र तीळ तीळ तुटत होते. ते ब्राह्मणसमाजाची दैना पाहून दु:खी झाले. ही दयनीय अवस्था त्यांनी आपल्या वागण्यानेच करुन घेतली होती. ते जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा - ‘ राजा हा विष्णूचा अंशावतार आहे ’ या श्रध्देने अनेक ब्राह्मण यमुनेत स्नान करुन ओलेत्याने बादशहाचे दर्शन घेण्यास जात. ते काशीला होते तेव्हा विश्वेश्वराच्या मंदिरातील पुजारी बादशहाची प्रकृती चांगली रहावी आणि त्यास उदंड राज्यसंपदा लाभावी म्हणून शंकराच्या पिंडीवर संकल्प सोडत होते. अत्यंत शूर असलेले रजपूत आणि मराठे सरदार आपापसांत लढाया करुन परस्पर संघर्षाला खतपाणी घालत होते. समर्थांनी लिहून ठेवले आहे –

“ कळहो लागला पंडिता पंडिताला । कळहो लागला योगिया योगियाला ।
कळहो लागला तापसा तापसाला । कळहो लागला ज्ञानिया ज्ञानियाला ” 

जनी उदंड पाहीले ! कळहो करीत राहिले ! - हे होते त्या वेळेच्या भारताचे दैवदुर्विलासी चित्र. माणसांची मने मरुन गेली होती. आणि शरीरे म्हणजे जिवंत प्रेते झाली होती. असंख्य स्त्रिया भ्रष्टविल्या जात असताना कुणाचाही संताप होत नव्हता. जणू हे सारे देवाच्या इच्छेने घडत आहे अशा निर्विकारतेने लोक या घटनांकडे पहात होते. 

समर्थांना कळून चुकले की, ज्यांना दोन वेळेस पुरेसे अन्न मिळत नाही आणि पत्नी अगर मुलगी यांचे सरक्षण करता येत नाही त्या लोकांना संसार नाशिवंत आहे असे सांगणे फार मोठा नैतिक अपराध ठरेल. ज्यांच्या संसाराच्या पटावरील सार्या् सोंगट्या उदध्वस्त झाल्या आहेत त्यांना मायाब्रह्माचा उपदेश करणे ही सामाजिक गुन्हेगारी ठरेल. भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे, हे ह्या प्रशांत पुरुषाने जाणले. लोकांच्या समोर रामकथा ठेवली पाहिजे असे त्यांना मनोमन वाटू लागले. रामाची स्त्री देखील पळवून नेली होती पण म्हणून रामाने राजकारण-संन्यास घेतला नाही. याऊलट त्याने वानरसेनेचे संघटन करुन रावणास ठार मारले. “ संघटित व्हा आणि जे तुमच्या स्त्रिया पळवून नेतात त्यांना ठार मारा ”, हा संदेश लोकांच्या समोर ठेवायचा असेल तर रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड नेली पाहिजे, हा त्यांचा ठाम निर्धार झाला. समाजाला झालेला रोग त्यांना समजला आणि त्यावर औषधही सापडले. आपापसांत संघर्ष हा हिंदू समाजाला झालेला रोग होता आणि हिंदू समाजाचे संघटन हे त्यावरील रामबाण औषध होते. म्हणून जागोजागी समर्थ मठांची निर्मिती करत आणि आपला एक पूर्णवेळ प्रचारक त्या ठिकाणी नेमत. त्या त्या प्रांतामध्ये, त्या त्या भाषेमध्ये त्यांनी काव्यरचनाही केली. तंजावर, मद्रास, रामेश्चर, मन्यारगुड्डी, कन्याकुमारी ह्या दक्षिणेकडील भागातही समर्थांनी मठस्थापना केली. 

!! जय जय रघुवीर समर्थ !!

संत तुकारामांचे काही अप्रसिध्द अभंग - १


अभंग २४६. संत तुकाराम गाथा

अवतार सूर्यवंशीं दिव्य घेतला स्वामी । एकपत्‍नी व्रत करुनि राहिला नेमी ।

मर्दिलें ताटिकेसी सुख वाटलें भूमी । रक्षोनी यज्ञ केला कीर्ति प्रख्यात नामीं ॥१॥

जयदेवा रघुनाथा जय जानकीकांता । आरती ओंवाळीन तुजलागीं समर्था ॥२॥

विदेही राजयानें पण केलासे भारी । तें शिवचाप मोठें मोडुनियां सत्वरीं ।

वरिलें जानकीसी आदिशक्ति सुंदरी । जिंकुनी भार्गवाला बहु दाविली परी ॥३॥

पाळोनी पितृवाक्य मग सेविलें वन । हिंडतां पादचारी मुक्त तृण पाषाण ।

मर्दिले दुष्ट भारी दैत्य खरदूषण । तोषले सर्व ऋषि त्यांसि दिलें दर्शन ॥४॥

जानकी लक्ष्मणासहित चालतां त्वरें । भेटली भिल्लटी ती तिचीं उच्छिष्ट बोरें ।

भक्षुनी उद्धरिले कबंधादि अपार । देखिली पंचवटी तेथें केला विहार ॥५॥

पातली शूर्पणखा तिचें छेदिलें नाक । जाउनी रावणासी सांगे सकळ दुःख ।

तेथोनी पातला तो मायामारीच देख । पाहतां जानकीसी तेव्हां वाटलें सुख ॥६॥

तें चर्म आणावया राम धांवतां मागें । रावणें जानकीसी नेलें लंकेसी वेगें ।

मागुता राम येतां सीता न दिसे चांग । तें दुःख ठाकुनियां हृदय झालें भंग ॥७॥

धुंडितां जानकीसी कपि भेटला त्यांसी । सुग्रीव भक्त केला मारुनियां वाळीसी ।

मेळविली कपिसेना शुद्धि मांडिली कैसी । मारुती पाठविला वेगेंकरुनी लंकेसी ॥८॥

मारिला आखया तो जंबुमाळी उत्पात । जाळिली हेमपुरी बहु केला निःपात ।

घेउनी शुद्धि आला बळी थोर हनुमंत । सांगता सुखवार्ता मन निवालें तेथ ॥९॥

तारिले सिंधुपोटीं महापर्वत कोटी। सुवेळा शिखरासी आले राम जगजेठी ।

मांडिलें युद्ध मोठें वधी राक्षस कोटी । रावण कुंभकर्ण क्षणामाजी निवटी ॥१०॥

करुनी चिरंजीव बिभीषण जो भक्त । दिधलें राज्य लंका झाली कीर्ति विख्यात ।

देखोनी जानकीला सुखी झाले रघुनाथ । तेहतीस कोटी देव जयजयकारें गर्जत ॥११॥

पुष्पकारुढ झाले अंकीं जानकी भाजा । येतांचि भेटला भरत बंधु वोजा ।

वाजती घोष नाना गुढया उभविल्या ध्वजा । अयोध्येलागीं आला राम त्रैलोक्यराजा ॥१२॥

पट्टाभिषेक केला देव सेविती पाय । चिंतितां नाम ज्याचें दूर होती अपाय ।

उत्सव थोर झाला वाचे वर्णितां नये । तन्मय दास तुका उभा कीर्तनीं राहे ॥१३॥

संत तुकाराम 

Sunday, March 20, 2011

एक कटाक्ष या गोष्टीकडे - भाग १ ....



नारायण सूर्याजीपंत ठोसर (रामदास) हे नाशिक टाकळी  येथे १२ वर्षे घोर तपश्चर्या करत होते. त्याच काळात त्यांनी चालविलेल्या घोर तपश्चर्येची गावकर्‍यांना प्रारंभी कल्पना येईना. विविध ग्रथांचा अभ्यास करुन त्यांनी चालविलेली वाडःमयसाधना कुणाच्याच ध्याना येईना. स्वत:ची जाहिरात करणे हे रामदासांच्या स्वभावात नव्हते. पण रामरायाला कणव आली आणि त्यांनी एक अद्भुद नाट्य घडविले.

टाकळीपासून तीन कोसावर दसपंचक नावाचे चिमुकले गाव. त्या गावातील गिरीधरपंथ कुलकर्णी नामक गृहस्थ मरण पावले. खरेतर गिरीधरपंथ जिवंतच होते. पण त्या खेडेगावात चांगला गृहस्थ वैद्य असणार कोढून ? कुणीतरी अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेल्या वैद्याने गिरीधरपंथ गेल्याचे सांगितले. त्याचे नाडीपरीक्षेचे ज्ञान म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी ठरते, तसेच. पण त्यामुळे कुलकर्णी कुटुंबात एकाच कोकाहाल माजला. ते प्रेत दहन करण्यासाठी टाकळीस आणले. खरे तर प्रसंग खूप गंभीर होता. पण गावातल्या काही वात्रट मंडळींनी कुलकर्णी कुटुंबातल्या माणसांना मुद्दाम रामदासांकडे पाठवले  "आमच्या गावात एक बालयोगी आहेत पगा.लई तासंनतास ध्यान लावत्याती. अवं  त्याची क्रिपाद्रीष्टी पडायचा आकाश, की ह्यो मेला माणूस उठून बसलाच पगा. "  कुलकर्णी कुटुंबातल्या माणसाची माणसांची मन:स्थिती विलक्षण हळवी झाली होती. त्यांना जरा आशा वाटली. त्यांनी रामदासांना त्या ठिकाणी बोलावून  आणिले. रामदास त्या प्रेताजवळ आले. त्यांचे आरोग्यशास्त्राचे ज्ञान अफाट होते, आणि योगसाधनेचा अभ्यास असल्यामुळे नाडीपरीक्षा उत्तम होती. त्यांनी गिरीधरपंतांच्या नाडीचे ठोके टिपलेमात्र, आणि ते आश्चर्याने म्हणाले ----- " तुम्ही लोक वेडे की खुळे ? कुणा पामराने पंत गेल्याचे सांगितले ? अहो ! नाडी चालू आहे. जरा सूत आणा पाहू. ! "

गिरीधरपंतांच्या पत्नीने आपल्या साडीचेच सूत तोडले आणि समर्थांच्या हाती दिले. समर्थांनी ते गिरीधरपंतांच्या नाकपुडीजवळ धरले. गिरीधरपंतांच्या श्वासाने सूत किंचित हालले, आणि भोवतालच्या आक्रोशाचे एकदम आनंदात रुपांतर झाले. प्रेताच्या दोर्‍या सोडण्यात आल्या.

समर्थ म्हणाले, " नाशकात चांगल्या वैद्याला दाखवा. औषधोपचार करा. यास काहीही झालेले नाही. हा दीर्घ काळ जगेल. "

गिरीधरपंत वाचले. त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांना समर्थांबद्दल अत्यंत कृतज्ञता वाटली. त्यांनी आपला पहिला पुत्र रामदासांच्या चरणी अर्पिला. स्वत: समर्थांनी त्यांचे नाव " उद्धव " असे ठेविले. मात्र पोर मोठे होईपर्यंत सांभाळण्यासाठी पुन: अन्नपूर्णाबाईंकडे दिले.

या घटनेमुळे समर्थांचे निंदक समर्थांना वंदू लागले. इतके  दिवस दुरून त्यांना चिडवणारी पोरे त्यांच्या जवळ जाऊ लागली. समर्थांनी लिहून काढलेली रामायणाची पोथी, विवध उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसुत्र हे सारे पाहून मंडळी स्तिमित झाली. इतके दिवस गोसाव्यास आपण वृथा गांजले याचा त्यांना मनस्ताप झाला. लोक त्यांना समर्थ म्हणू लागले. पण ते मात्र रामरायाला समर्थ म्हणत आणि स्वत:ला रामाचा दास म्हण्वून घेत.

सज्जन हो, श्री समर्थ रामदास म्हणजेच श्रीराम समर्थ आहेतच, त्या समर्थाचा मी दास आहे.

!! जय जय रघुवीर समर्थ !!

Thursday, March 17, 2011

समर्थांचे संभाजी राजेंना गद्य पत्र !!!



समर्थांचे संभाजी राजेंना गद्य पत्र

अकरा सूचना : सन १६८१

दुर्मति संवस्तरी पुष्य वदी नवमीस श्री ......... की आपला संपूर्ण प्रसंग संनीधची आहे ऐसे म्हणोनी ते समई राजश्री 

(संभाजी) यासी कित्येक कृपापूर्वक वचने -

॥१॥ श्री शिवराज कैळासवासी यांचे वंश्परंपरेसी राज्यभोग बहुत आहे.

॥२॥ वर्षे पाचपर्यंत अति कठिण आहे. दैवी प्रार्थना सावधानतेने रक्षिले पाहिजे.

॥३॥ पूर्वि राजश्रीस (शिवाजी) राजधर्म व क्षात्रधर्म व आखंड सावधान ऐसी पत्रे पाठवली होती. ती पत्रे प्रसंगानुसार वाचून मनासि आणून वर्तुणूक होईल तरी त्या वचनाचा अभिमान श्री देवासि आहे.

॥४॥ नळ संवस्थरि १८ शस्त्रे समर्पिली ते समई - श्रीचे इच्छेने राजश्री यांसि कितेक आशीर्वाद वचने प्राप्त जाली तो अर्थ काही घडला असेल आणिकहि द्वादश वर्षा उपरी उत्कट भाग्य आहे ते समईचा संकल्प वाक्य लेखी लेख होता स्मरण मात्र द्यावे.  कोण्हे समई कोण्हासि काय घडणार ते सुखे घडेल.

॥५॥ संनिध वस्त्रपत्रादिक जो पदार्थ होता तो सर्व श्रीस समर्पिला. चाफळी प्रसंगानुसार श्रीच्या देवळयाचा कार्यभाग घडोनि येईल हा ही पदार्थ राजश्रीच्या विचारे त्या चि कार्यासि लावावा अथवा महाद्वारी दीपमाला कराव्या.

॥६॥ प्रमादि संवस्तरी सींगणवाडीचे मठी राजश्रीनी श्री च्या सर्व कार्याचा आईकार केला त्या प्रमाणे त्यांनी नित्य उत्सव व यात्रा समारंभ उत्तम चालविला. पुढे ईमारतीचेही स्मरण द्यावे हे त्यानी मान्य केल्यावरि आपण सज्जनगडी सुखे वास्तव्य केले.

॥७॥ श्री च्या भोगमूर्ती आणविल्या त्याचि प्रतिष्ठा मल्लारि निंबदेव त्याच्या बंधूच्या हस्ते करावि.

॥८॥ कर्नाटक रितीचा रथ करुन या भोगमूर्ती आणवून प्रतिवर्षी रथोत्साव केल्याने राज्यासी कल्याण आहे. वार्षिक चिन्ह दिसोनी येईल. विशेष चिन्ह दिसोनी येईल. त्याउपरि श्रीचे इमारतीसी आरंभ करावा एक शत येकवीस खंडी धान्य संकल्पाची गती सांगावी.

॥९॥ श्रीचे देवालय अशक्त जाले नदी संनीध आहे.

॥१०॥ पूर्वी येक प्रसंग जाला होता राजश्री श्रीच्या दर्शनासी सज्जनगडासी येणार म्हणोनि स्छळसिध्दीकारणे मनुष्य आले होते ते समईचे वर्तमान । उत्तरेकडील राजपुत्राचे आगमन जाले म्हणोनि ऐकिले ते समयी आता काय आला म्हणोनि बोलिले परंतु या उपरिही ते प्रांतीचे लोक अनुकूळ करुन घेतील तरी उभयता योगे कार्यसिध्दीच आहे परंतु त्वरा पाहिजे । प्रतिवर्षी श्रीचे यात्रेसी राजगृहीहून येक भले मनुष्य संरक्षणासी पाठवीत जावे व समारंभादि रथोत्साव समऊ हस्ती २ कर्णे २ वाद्ये जोडे २ तीवाशे २ जमाखाने २ शामिने २ येणेप्रमाणे पाठवून  श्रींचा यात्रासमारंभ संपादुन पदार्थ फिराऊन आणित जावे हा हि निश्चय पूर्वीचाचि आहे. लेख हि होता.

॥११॥ श्रीचे पेठेचे पत्र दृश्य करावे कार्यकर्ते नीति वदावी । श्री कार्यासि अतितत्पर ऐंशा पुरुषाच्या योगे धर्मवृत्धी आहे धर्मवृत्धीने राज्यवृत्धि आहे ॥

इतके बोलिलो स्वभावे । यात मानेल तितुके घ्यावे ।
श्रॊती इदास न व्हावे । बहु बोलिलो म्हणोनि ॥

औदार्य धर्ममूर्ती । काय लिहिणे तयाप्रती ।
धर्मस्छापनेची कीर्ती । सांभाळली पाहिजे ॥

देवद्रोही यांचा नाश चि आहे
समुद्रतीरस्छांचा नाश आहे.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Tuesday, March 1, 2011

समर्थांचीं काव्यसृष्टी - भाग १



॥ श्रीराम समर्थ ॥

श्री समर्थ रामदास स्वामी भारतभर प्रवास करत आहेत. प्रवास संपत आलेला होता. समर्थ रामदास स्वामी पैठण ला आलेले आहेत. पैठण हे एका अर्थाने समर्थ रामदासांचे आजोळ. समर्थ रामदास स्वामींची आई आणि नाथांची पत्नी गिरिजाबाई या दोघी सख्या मावस बहिणी. समर्थ रामदासांचा जन्म झाला. त्या चार - सहा महिन्यांचा मुलगा नाथांच्या मांडीवर ठेवला गेला होता. माझ धर्म संस्थापनेच कार्य हा मुलगा पुढे चालु ठेवील. हा नाथांचा आशिर्वाद या बालकाला त्यांच्या मांडीवर बसलेला असतानाच मिळाला होता. नाथ गेले होते. समर्थ रामदास स्वामी भारतभ्रमण संपल्यानंतर मुद्दाम पैठण ला आले. लहानपणापासून विश्वाची चिंता लागलेली आहे. समाज बदलला पाहिजे, लोक सुखी झाले पाहिजेत. समर्थांच्या सहवासात दहा वर्ष राहिलेले गिरीधर महाराज त्यांच्या समर्थ प्रताप या ग्रंथात लिहितात,

समर्थ सदगुरु एकांती बैसती । प्रांतीचे लोक दर्शनास येती ।
सकळ प्रांताचा परामर्श घेती । चिंता करीती विश्वाची ॥

कैची देव देवालये तगती । कैसे कुटुंब वत्सल लोक जगती ।
कैसे क्षेम राहिले जगती । कोणीकडे जातील हे ॥

या लोकांच काय होणार, या कुटुंबांच काय होणार, या समाजच काय होणार, चिंतेने उर फाटतो...
या चिंतेतन हृदयातल रक्त सांडत सांडत हिमालयापासून - कन्याकुमारी पर्यंत हा महापुरुष सगळीकडे फिरत राहिला. आणि सगळ्या देव-देवतांना एकच साकड घालत राहिला.
तुळजाभवानीकडे आले, देवीला म्हणाले,

दुष्ट संहारिले मागे । ऐसे उदंड ऐकिले ।
परंतु रोकडे कांहीं । मुळ सामर्थ्य दाखवी ॥

तुझा तू वाढवी राजा । शिघ्र आम्हाची देखता ।
मागणे एकची आतां । द्यावे ते मज कारणें ॥

रामदास म्हणे माझें । सारे आतुर बोलणें ।
क्षमावे तुळजा मातें । इच्छा पूर्णचि तू करीं ॥

भगवंताच्या हातात शस्त्र नाहीं, हि कल्पना समर्थांना मानवत नाही, जागोजागी हनुमंताची मंदिर उभी केलेली आहेत, वीर हनुमान आहे. तुळजाभवानीची मंदिर उभी केलेली आहेत. हातात त्रिशूळ आहे आणि महिषासुराच मस्तक तिने तोडलेल आहे. पांडुरंगाला जेव्हा कमरेवर हात ठेवून उभं पाहिलं, तेंव्हा समर्थ अस्वस्थ झाले.

येथे उभा का श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥
काय केले चापबाण । कर कटेवरी ठेवून ॥
काय केले वानरदळ । इथे जमविले गोपाळ ॥
काय केली अयोध्यापुरी । इथे वसविली पंढरी ॥
काय केली सीतामाई । उभि राही रखुमाई ॥

शेवटी ते म्हणतात, त्याठिकाणी त्यांनी हनुमंताला आलेलं पाहिलं. कारण आपण नामदेवांच्या आरतीत पाहतो, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. विठ्ठलासमोर हनुमंताला
पाहिल्यावर समर्थ प्रश्न विचारतात,

का हनुमंत एकला । का पक्षामधुनी फुटला ॥

हनुमंत कसा एकता आला, बाकीचे गेले कुठे, समर्थांच्या अंत:करणांत कशा प्रकारच वादळ चालल असेल. त्यांच्या अंत:करणातील वादळाचा अविष्कार या काव्यसृष्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणून ते जेंव्हा आले परशुरामाकडे चिपळूण ला, त्या परशुरामाला त्यांनी प्रश्न केला,

किति वेळ मागे तुंवा युद्ध केले ।
किति वेळ आम्हासि तू राज्य दिल्हे ।
अकस्मात सामर्थ्य तें काय झालें ।
युगासारिखे काय नेणोनि जालें ॥

तुझ सामर्थ्य गेल कुठे, समर्थांच्या मनामध्ये सशस्त्र क्रांतीचा विचार कस घर करून बसला होता हे या सगळ्या काव्यांतून दिसून येत. हि सगळी तळमळ जी आहे, शांत झाली, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने. ६ जून १६७४, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी यादिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ठरला होता. त्यावेळेस समर्थांनी केलेलं जेम अद्भुत काव्य आहे, आनंदवनभूवनी या नावाने तें प्रसिद्ध ओळखल जात. समर्थ रामदास स्वामी  तुळजाभवानीच्या पूजेला प्रतापगडावरती आलेत. असं ठरलं होत, ज्या ३६० किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांची राजवट आहे, त्या ३६० किल्ल्यांवरती राज्याभिषेकाच्या वेळेला पहाटे ५.०० वाजून ४० मिनिटांनी तोफांच्या तीन सलाम्या द्यायच्या. किल्लेदाराने जी पदवी शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे, त्या पदवीचा जयघोष करायचा, समर्थ रामदास गिरीधर स्वामींच्या बरोबर प्रतापगडावर आलेले आहेत. त्यांनी पहाटे ४.०० वाजता तुळजाभवानीची पूजा केलेली आहे. तुळजाभवानीला नवस बोलले होते. तुझा तू वाढवी राजा  शिघ्र आम्हाचि देखतां तो नवस पूर्ण केला, सोन्याचे फूल देवीला अर्पण केलं आणि त्यानंतर ५.४० मिनिटे केव्हा होतील याची वाट समर्थ रामदास पाहत होते. ३५० वर्षांच्या काळ्या किभिन्न अमावस्येनंतर स्वातंत्र्याचा तो सूर्य उदित झाला. आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने अनेकांच्या जखमा भरून निघाल्या. तोफांची सलामी झाली, किल्लेदाराने गर्जना केली.

महाराज....सिंहासनाधिश्वर....प्रौढप्रताप पुरंदर.... सेनाधुरंदर.... क्षत्रियकुलावंतस....राजा शिवछत्रपती महाराज  
राज्याभिषेकाची ती गर्जना ऐकली.
समर्थांचं अंत:करण आनंदाने भरून आल, ते गिरीधरांना म्हणतात मला काव्यस्फुर्ती होते आहे, मी सांगतो, तू लिही.  समर्थ सांगू लागले, गिरीधर लिहुं लागले.
समर्थ बोलुं लागले,

स्वप्नी जे देखिले रात्री ।  ते ते तैसेचि होतसे ।
हिंडता फिरता गेलो । आनंदवनभूवनी ॥

विघ्नांच्या उठिल्या फौजा ।  भीम त्यावरी लोटला ।
घर्डिली, चिर्डिली रागे  ।  आनंदवनभूवनी ॥

खौळले लोक देवांचे  ।  मुख्य देवचि उठिला  ।
कळेना काय रे होते  । आनंदवनभूवनी ॥

बुडाले सर्वही पापी  ।  हिंदुस्थान बळावले ।
अभक्तांचा क्षयो झाला ।  आनंदवनभूवनी ॥

त्रैलोक्य गांजिले मागे  । विवेकी ठाउके जना ।
कैपक्ष घेतला रामे  । आनंदवनभूवनी ॥

बुडाला औरंग्या पापी ।  म्लेंच्छ संहार जाहला ।
मोडिली मांडिली क्षेत्रे  ।  आनंदवनभूवनी ॥

उदंड जाहले पाणी  । स्नान संध्या करावया ।
जप-तप-अनुष्ठाने  । आनंदवनभूवनी ॥

रामवरदायिनी माता ।  गर्द घेउनी ऊठिली ।
मर्दिले पूर्वीचे पापी  ।  आनंदवनभूवनी ॥

भक्तांसि रक्षिले मागे  ।  आताहि रक्षिते पहा ।
भक्तांसि दीधले सर्व । आनंदवनभूवनी ॥
  
वनभुवनी काशीच पौराणिक नाव आहे. स. न १६३४ साली समर्थ काशीला होते. हनुमान घाटावर झोपले होते. त्यांना पहाटे स्वप्न पडल कि, महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आहे, हिंदुंच सिंहासन निर्माण होत आहे. त्या स्वप्नान त्याचं अंत:करण भरून आल, आज ४० वर्षानंतर ते स्वप्न खर होत होत. तें स्वप्न खर होत असल्याचा आनंद मिळत होता. म्हणून आनंदवनभूवनी अस त्या काव्याच नाव दिलेलं आहे. आनंदवनभूवनी ....

सबंध समर्थांच्या काव्यसृष्टीच्या पाठीमागे हेतू होता, आनंदवनभूवन निर्माण व्हाव. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने हे आनंदवनभूवन निर्माण झाल. आणि मग समर्थांना अस वाटल कि आतां आपण सुखाने देह ठेवावा.

उर्वरित भाग पुढे पाहूया ...
क्रमश:

॥ श्रीराम समर्थ ॥

 सौजन्य : समर्थांची काव्यसृष्टी, सुनील चिंचोळकर.