Friday, May 13, 2011

रामदासी संप्रदाय व श्री रामदास स्वामी संस्थानाची स्थापना !


श्रीराम समर्थ,

श्री समर्थ रामदास स्वामींनीं प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्री समर्थांना जाववली. श्री समर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाजकार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती करेल असा श्री समर्थांचा विश्वास होता.

त्यांनी इ. स. १६४४ मध्ये शहापूर (जि. सातारा) येथे पहिला मारुती स्थापन करुन रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करुन संप्रदायाला संघटनेचे स्वरुप दिले. अशा रितीने रामदासी संप्रदायासाठी संस्थानाची स्थापना इ. स. १६४८ मध्ये श्री रामदास स्वामींनीच केली व हेच संस्थान श्री रामदास स्वामी संस्थान म्हणून 
ओळखले जाऊ लागले.



इ. स. १६४४ ते १६५२ या काळात अन्य दहा मारुतींची स्थापना करुन एकूण अकरा मारुती स्थापन केले आणि श्री समर्थांनी रामदासी संप्रदायाच्या कार्याला चालना दिली.

श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानाला हिंदवी स्वराज्यापासून राजसत्तेकडून व समाजाकडून सतत पाठिंबा मिळत राहिला.

श्री समर्थ रामदास स्वामी चाफळहून इ. स. १६७६ मध्ये सज्जनगडावर वास्तव्यास आले. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच 
सज्जनगडावरील मठ होय.



श्री समर्थांनी तंजावरच्या (तामिळनाडू) कारागिराकडून घेतलेल्या पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती या मठातील शेजघरात ठेवल्या होत्या. अखेरचे पाच दिवस अन्नत्याग करुन श्री समर्थांनी याच मूर्तींचे समोर माघ वद्य ९ शके १६०३ (दि. २२ जानेवारी १६८२) रोजी देह ठेवला. मठाचे उत्तरेस एक खळगा होता. तेथे श्री समर्थांचे अंतिम संस्कार करण्यात आले. हे संस्कार श्री समर्थांचे शिष्य उध्दवस्वामी यांच्या हस्ते पार पडला.

त्यावेळी श्री समर्थशिष्य कल्याणस्वामी गडावर नव्हते. परंतु शिष्या चिमणाबाई उर्फ अक्काबाई त्यावेळी गडावर होत्या. ज्या जागी श्री समर्थांचे अंतिम संस्कार करण्यात आले त्याजागी समाधी बांधण्यात आली व त्याचेवर मंदिर उभारुन मंदिरात वरील पंचधातूंच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.



सज्जनगडावरील श्री समर्थांचा मठ, समाधीमंदिर, अंगाई व इतर मंदिरे तसेच भांडारगृह इ. ऐतिहासीक वास्तू संस्थानच्या अधिपत्याखाली आहेत. काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत दैनदिन नित्य कार्यक्रम, गुरुपोर्णिमा, दासनवमी उत्सव, रामनवमी व इतर नैमित्तिक कार्यक्रमाची परंपरा संस्थानातर्फे गेली ३२९ वर्षे अव्याहतपणे चालू आहे.

सौजन्य : श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड व स्वानुभव !
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥