Saturday, May 21, 2011

जाहिर आवाहन ...पाणीयोजना !!!


॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

श्री संत रामदास स्वामींच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या व रामदास स्वामींच्या समाधिस्थानामुळे 
प्रसिध्द असलेल्या सज्जनगडावर पाण्याच्या दूर्भिक्षामुळे आणि तिथे असलेल्या अशुध्द पाण्यामुळे 
भाविकांचे अतोनात हाल होत असतात. सज्जनगडावरील अन्नदान व निवास व्यवस्था पाण्याअभावी 
कधी कधी बंद करावे लागते.

या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रीरामदास स्वामी संस्थानाने विना विजखर्चाची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र शासनास सादर केली होती. त्या काळात जलसंपदा मंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी स्वतः लक्ष घालून ही योजना पूर्ण केली आहे.

परंतु आमदाराने या योजनेच्या उदघाटनास जाहिर विरोध केल्याने योजना पूर्ण होऊनही भाविक, पर्यटक व गडावरील सर्व सेवेकरी या सर्वांना अशुध्द पाण्याचा वापर करावा लागत आहे.

शिवरायांचे प्रेरणास्थान असलेल्या, तीर्थक्षेत्र असलेल्या सज्जनसडासाठी पूर्णपणे तयार झालेल्या या योजनेतून स्थानिक आमदारांच्या मतदार संघातील गावांना पाणी मिळाले पाहिजे असा त्या आमदारांचा मतदार संघातील गावांना पाणी मिळाले पाहिजे असा त्या आमदारांचा आग्रह आहे. खरं तर स्थानिक आमदारांच्या या गावांना लागूनच उरमोडी धरण आहे व या गावांची स्वतंत्र पाणी योजना आज कार्यान्वितही आहे.

सज्जनगडावर आता जे पाणी येणार आहे ते गडाच्या मागील बाजूस साधारणतः ६ कि. मी. लांब असलेल्या पांगारी तलावातून विजेचा वापर न करता पाईपलाईनद्वारे गडावर येणारं आहे. यासाठी मा. अजितदादा पवार यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहेच तसेच देशभरांतून समर्थभक्तांनी सुध्दा यासाठी अर्थिक मदत केलेली आहे श्री रामदास स्वामी संस्थानचा यांत सिंहाचा वाटा आहेच.

समर्थांच्या निर्वाणानंतर श्री रामदास स्वामी संस्थानाने समर्थांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम अव्याहतपणे केले व आजही करीत आहे. सज्जनगडावर झालेल्या विकासात संस्थानचा वाटा मोठा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

गडावरील विकासामध्ये पाणी हा प्रश्न खूप मोठा आहे व तो संस्थानने शासनाच्या सहाय्याने सोडविलाही आहे. आज ही पाणी योजना उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. केवळ स्थानिक आमदारांच्या नकारात्मक धोरणामुळे हे उदघाटन होवू शकत नाही. आम्हा सर्व समर्थ भक्तांचे मा. आमदारांना आवाहन आहे की त्यांनी या पाणी योजनेला विरोध करु नये.

स्थानिक आमदार मा. शिवेंद्रराजे भोसले व त्यांच्या घराण्याविषयी प्रत्येक समर्थभक्ताला व मराठी मनाला अभिमान आहेच. कृपया त्यांनी विरोध सोडावा अन्यथा यासाठी शांततापूर्ण आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.

आंदोलनाची सुरुवात म्हणून सर्व समर्थभक्त नागरिकांच्या संह्यांचे एक निवेदन मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते मा. एकनाथ खडसे आदी जेष्ठ नेत्यांना देण्यासाठी सह्यांची मोहिम सुरु करीत आहोत. आपण आपली स्वाक्षारी/सही या पाठींब्यासाठी आम्हाला द्यावी हि नम्र विनंती.

शेवटी हा समर्थ संदेश,

किती पाजिले पाणी तू तान्हेल्यास । किती अन्न दिले भूकेल्या जीवास ।
किती वेळ दिला प्रभू चिंतनाला । विचारील अंती हरी हे तुम्हाला ॥

आपले,
समर्थ भक्त परिवार, पुणे-मुबंई
श्री समर्थ रामदास स्वामी समुह, (फेसबुक माध्यम)

Friday, May 13, 2011

श्लोक ७५, पहाटेच्या शांत वेळीं भगवंताच्या चिंतनाचा !


समस्तांमधें सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहें ॥
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७५॥


समस्त = सर्व, सगळे, संपूर्ण. साचार = खरोखर, सत्य, वस्तुत:. संशय = संदेह, विकल्प, भय. वाऊगा = व्यर्थ, निरर्थक, मिथ्या.

खरोखर सर्व साधनांमध्ये नामस्मरण हें उत्कृष्ट साधन आहे. हें जर ध्यानांत येत नसेल तर श्रुति, स्मृति, पुराणें आणि संतांचे ग्रंथ नीट अभ्यासावे. नामाबद्दल येणारे निरर्थक विकल्प आपणहून सोडावे, अशा त्या भगवंताचे पहाटेच्या समयीं चिंतन करावें.

१) भगवंताच्या नामस्मरणांमध्यें पुढील तीन उत्तम लक्षणें आढळतात. (एक) नामाला कमीत कमी उपाधी आहे. (दोन) नामांत आरंभापासूनच भगवंताचें अस्तित्व असतें. (तीन) आणि नामाच्या अभ्यासांत इतर साधनांचें फळ आपोआप मिळतें.

२) नाम म्हणजे मी नाहीं. तो (भगवंत, आहे.) वेदशास्त्रपुराणें आणि संतांचे ग्रंथ या सर्वांमध्यें वरील अर्थ नाना प्रकारांनीं सांगितलेला आहे. म्हणून आध्यात्मिक वाड्:मयाचे परिशीलन करुन अखेर नामच हातीं लागतें.

३) संशय येणें हा जीवाचा स्वभाव आहे खरा. पण विवेकानें संशय – निदान निरर्थक संशय तरी - बाजूस सारल्यावांचून जीवाला नामस्मरणाचा आनंद भोगायला मिळणार नाहीं.

सौजन्य : सार्थ मनाचे श्लोक, के. वि. बेलसरे (बाबा)
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

रामदासी संप्रदाय व श्री रामदास स्वामी संस्थानाची स्थापना !


श्रीराम समर्थ,

श्री समर्थ रामदास स्वामींनीं प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्री समर्थांना जाववली. श्री समर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाजकार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती करेल असा श्री समर्थांचा विश्वास होता.

त्यांनी इ. स. १६४४ मध्ये शहापूर (जि. सातारा) येथे पहिला मारुती स्थापन करुन रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करुन संप्रदायाला संघटनेचे स्वरुप दिले. अशा रितीने रामदासी संप्रदायासाठी संस्थानाची स्थापना इ. स. १६४८ मध्ये श्री रामदास स्वामींनीच केली व हेच संस्थान श्री रामदास स्वामी संस्थान म्हणून 
ओळखले जाऊ लागले.



इ. स. १६४४ ते १६५२ या काळात अन्य दहा मारुतींची स्थापना करुन एकूण अकरा मारुती स्थापन केले आणि श्री समर्थांनी रामदासी संप्रदायाच्या कार्याला चालना दिली.

श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानाला हिंदवी स्वराज्यापासून राजसत्तेकडून व समाजाकडून सतत पाठिंबा मिळत राहिला.

श्री समर्थ रामदास स्वामी चाफळहून इ. स. १६७६ मध्ये सज्जनगडावर वास्तव्यास आले. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच 
सज्जनगडावरील मठ होय.



श्री समर्थांनी तंजावरच्या (तामिळनाडू) कारागिराकडून घेतलेल्या पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती या मठातील शेजघरात ठेवल्या होत्या. अखेरचे पाच दिवस अन्नत्याग करुन श्री समर्थांनी याच मूर्तींचे समोर माघ वद्य ९ शके १६०३ (दि. २२ जानेवारी १६८२) रोजी देह ठेवला. मठाचे उत्तरेस एक खळगा होता. तेथे श्री समर्थांचे अंतिम संस्कार करण्यात आले. हे संस्कार श्री समर्थांचे शिष्य उध्दवस्वामी यांच्या हस्ते पार पडला.

त्यावेळी श्री समर्थशिष्य कल्याणस्वामी गडावर नव्हते. परंतु शिष्या चिमणाबाई उर्फ अक्काबाई त्यावेळी गडावर होत्या. ज्या जागी श्री समर्थांचे अंतिम संस्कार करण्यात आले त्याजागी समाधी बांधण्यात आली व त्याचेवर मंदिर उभारुन मंदिरात वरील पंचधातूंच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.



सज्जनगडावरील श्री समर्थांचा मठ, समाधीमंदिर, अंगाई व इतर मंदिरे तसेच भांडारगृह इ. ऐतिहासीक वास्तू संस्थानच्या अधिपत्याखाली आहेत. काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत दैनदिन नित्य कार्यक्रम, गुरुपोर्णिमा, दासनवमी उत्सव, रामनवमी व इतर नैमित्तिक कार्यक्रमाची परंपरा संस्थानातर्फे गेली ३२९ वर्षे अव्याहतपणे चालू आहे.

सौजन्य : श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड व स्वानुभव !
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥