Sunday, February 27, 2011

श्रीसमर्थांचे रामराया जवळचे मागणे ...


कल्याण मागणें रामा तुज ... 

श्री समर्थ रामदास आपल्या सर्वांना आता माहितच असतील. श्री समर्थ रामदास जेव्हा तपश्चर्या, पुरश्चरणात असताना आणि भारत भ्रमण करीत असताना त्यांनी जी करुणाष्टके रचली, ज्या चौपदी आहे त्यात श्रीरामरायाजवळ जे काही मागणे मागितले त्यातील पुढील काही चौपदी येथे देत आहे.














कोमळ वाचा दे रे राम । विमळ करणी दे रे राम ॥ ध्रु० ॥
प्रसंग ओळखी दे रे राम । धूर्तकळा मज दे रे राम ॥ १ ॥
हितकारक दे रे राम । जनसुखकारक दे रे राम ॥ २ ॥
अंतरपारखी दे रे राम । बहुजनमैत्री दे रे राम ॥ ३ ॥
विद्यावैभव दे रे राम । उदासीनता दे रे राम ॥ ४ ॥
मागों नेणें दे रे राम । मज न कळें ते रे राम ॥ ५ ॥
तुझी आवडी दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ॥ ६ ॥














संगीत गायन दे रे राम । आलापगोडी दे रे राम ॥ ध्रु० ॥
धातमाता दे रे राम । अनेक धाटी दे रे राम ॥ १ ॥
रसाळ मुद्रा दे रे राम । जाड कथा मज दे रे राम ॥ २ ॥
दस्तक टाळी दे रे राम । नृत्यकला मज दे रे राम ॥ ३ ॥
प्रबंध सरळी दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम ॥ ४ ॥
सावधपण मज दे रे राम । बहुत पाठांतर दे रे राम ॥ ५ ॥
दास म्हणे रे सदगुण धाम । उत्तम गुण मज दे रे राम ॥ ६ ॥  














पावन भिक्षा दे रे राम । दीनदयाळा दे रे राम ॥ ध्रु० ॥
अभेदभक्ती दे रे राम । आत्मनिवेदन दे रे राम ॥ १ ॥
तद्रूपता मज दे रे राम । अर्थारोहण दे रे राम ॥ २ ॥
सज्जनसंगति दे रे राम । अलिप्तपण मज दे रे राम ॥ ३ ॥
ब्रह्मअनुभव दे रे राम । अनन्यसेवा दे रे राम ॥ ४ ॥
मजविण तूं मज दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ॥ ५ ॥



















ह्यावरून मी आत्ताच दासनवमी निमित्त २-३ दिवसाच्या मुक्कामात घेतलेला स्वानुभव. मी सज्जनगडावर श्री समर्थांच्या तसेच रामदासी संप्रदायाच्या सान्निध्यात होतो. वरील जे जे मागणे श्री समर्थांनी रामरायाजवळ मागितले आहे ते त्यांच्यात होतेच, परंतु त्यांनी जे काही रामदासी महंत तयार केले वा अथवा आत्ता जे जे आहेत त्यांच्या सर्वांतच ते सर्व गुण तयार केले आहेत. आत्मसात केले आहे. बिंबवले आहेत.

बाहेरील समाजात वा व्यवहारात आजकाल personality development चे अनेक क्लासेस , कोर्सेस आहेत. पण श्री समर्थ रामदास स्वामींनी ह्या सर्व अभ्यासक्रम ४००-४५० वर्षांपूर्वीच मांडून दिलेला आहे. मग certificate च्या नावावर पैसा कशाला खर्च करायचा, त्यापेक्षा ग्रंथराज दासबोध वाचला नीट अभ्यासला आणि आचरण केले कि सहज प्राप्त आहे. स्वामी विवेकानंदाचे रामकृष्ण मिशन हे पण असेच आहे.
personality development चे अगदी विद्यापीठ आहे. 

वामराव पै पण म्हणतात " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. "
जो रामदासी आहे, तो उत्तम भजन करू शकतो, तो उत्तम कीर्तन करू शकतो. भगवदभजनात ते उत्तम प्रकारे तल्लीन होतात. परमेश्वराची उपासना, पूजन उत्तम करतो. तो उत्तम वाद्य (तबला, पेटी व टाळ) वाजवू शकतो. उत्तम पाककला अवगत आहे. वेदांचे उत्तम ज्ञान आहे. त्यांचे पाठांतर उत्तम आहे. अनेक ग्रंथाचे उत्तम वाचन आहे. योग्य विचारांचे लेखन ते उत्तम प्रकारे करतात. तब्येत व शरीराने उत्तम आहेत. कोणताही किंतु मनात न बाळगता ते उत्तम रामरायाची सेवा करतात. 

हे सर्व पाहिल्यानंतर मी माझ्या अंतरंगात झाकून पहिले आणि दिसले कि मीच माझा घात करत आहे. आपण समर्थांचा भक्त म्हणवतो पण खरच त्यांच्या नेमक्या कोणत्या गोष्टी आपण पूर्णपणे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो ? हा सगळा अनुभव मनाला एक चटका देऊन जातो.

म्हणूनच श्री समर्थ दासबोधात  म्हणतात ,

" उत्तम , उदात्त ते ते घ्यावे , हिणकस , हीन ते ते टाकावे ,
जीवन आपुले करवुन घ्यावे , सफल, संपन्न "

बहुत करावी सेवा । भगवंत भजनीचा मेवा ।
उत्तम गुणे झिजवी देहा । या संगाने तोडी सर्व मोहा ॥ श्रीराम ॥

     
नक्कीच सुधारणा घडली पाहिजे ...